कथा श्रीक्षेत्र नस्तनपुरची

या स्वयंभू मूर्तीबाबत व स्थानाबाबत काशीखंड, महाभारत, रामायण व लिलावती या ग्रंथात उल्लेख झालेला आहे. या ठिकाणाबाबत वयोवृद्धाकडून व ग्रामस्थाकडून असे ऐकावयास मिळते कि,

श्रीराम या ठिकाणी दोन वेळा येऊन गेले असून रावणाने सीताचे हरण केल्या नंतर सीतेचा शोध घेत घेत राम मनमाड जवळील अनकाई किल्ल्यावर अगस्ती ऋषीच्या दर्शनासाठी गेले अगस्ती ऋषींना त्यांनी आपले दुःख कथन केले असता अगस्ती ऋषींनी रामास सांगितले की “रावण व राम या दोघांची रास एकच आहे. आपणास जर रावणावर विजय मिळवायचा असेल तर आपण साडेतीन शनिची स्थापना करावी’’ रामाने शनिची स्थापना करण्याचे ठरविले व रामचंद्र अगस्ती ऋषीचा निरोप घेऊन सीतेचा शोध घेण्यासाठी पुढे निघाले त्या काळी हा भाग म्हणजे दंडकारण्य म्हणून ओळखला जाई सितामाईचा शोध घेत-घेत रामचंद्र ‘नशरथपूर म्हणजेच आत्ताचे नस्तनपूर’ या ठिकाणी आले

संध्याकाळ झाल्याने व खूप घनदाट वृक्षाच्या छायेमुळे पुढे जाणे शक्य नव्हते म्हणून या ठिकाणीच रामाने मुक्काम करण्याचे ठरविले, राम-लक्ष्मण त्रिकाळ संध्या करीत असत. सायंसंध्येची वेळ झाल्याने प्रभू रामचंद्र संध्या करू लागले. सूर्यास अर्घ्य देत असताना रामचंद्राच्या हातात सूर्याने नस्तनपूर क्षेत्री स्थापन झालेली शनिदेवाची ही मूर्ती दिली. रामाने ह्या शनिदेवाच्या मूर्तीचे पूजन करून या ठिकाणी मूर्ती स्थापन केली. सदर मूर्ती वालुकामय रत्न जडीत अशी मूर्ती आहे. सकाळी पूजाअर्चा करून प्रभू रामचंद्रांनी सितामाईच्या शोधासाठी पुढे मार्गक्रमण केले.